संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
घारगाव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरुन 3 महिन्याच्या चिमुकल्याला फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून, आई-वडिलांनीच चिमुकला शिवांशचा खून करुन प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. 4 डिसेंबरला सकाळी 9.16 वाजेच्या सुमारास आंबीखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडूपामध्ये एक अंदाजे 3 ते 4 महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे. सदर अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करुन रवाना केले.
सदर पथकाने घटना ठिकाणी भेट देवून व मयत बालकाची पाहणी केली असता सदरचा प्रकार हा प्रथमदर्शनी घातपाताचा दिसून आला. पथकाने घटना ठिकाणी ये-जा करणार्या वाहनांच्या मार्गाची पाहणी करुन गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे मयत बालकाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना (ता. भोकरदन, जि. जालना) येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने भोकरदन परिसरामध्ये जावून प्राथमिक आरोग्य केंद्र, आशासेविका व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाल्याबाबत व त्यास 3 ते 4 दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याची अफवा पसरवली असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानंतर पथकाने वरील माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव (वय 37, रा. भिवपूर, पो. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना), कविता प्रकाश जाधव (वय 32, रा. सदर) व हरिदास गणेश राठोड (वय 32, रा. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्याकडे प्राथमिक चौकशी करुन विचारपूस केली असता वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावून घेत बारकाईने विचारपूस केली असता प्रकाश जाधव याने व त्याची पत्नी कविता यांनी त्यांचा मयत मुलगा शिवांश उर्फ देवांश यास हरिदास गणेश राठोड याच्याकडील कारमधून 3 डिसेंबर, 2025 रोजी पुणेच्या दिशेने घेवून जात घारगाव परिसरामध्ये मुळा नदीच्या पुलावर थांबवून गाडीचा चालक व प्रकाश जाधव या दोघांनी खाली उतरुन तेथे बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरुन त्याचा गळा दाबून व अंगावरील कपडे काढून घेत पुलावरुन खाली फेकून दिले असल्याचे सांगितले.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची कार (क्र. एमएच. 02. ईएच. 5354) ताब्यात घेतली आहे. या घटनेच्या तपासामध्ये मयत बाळाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने घारगाव पोलिसांत भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, ते पुढील तपास करत आहे.




