मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
सूर्य उगवला, प्रकाश पडला
आडवा डोंगर, आडवा डोंगर
तयाला माझा नमस्कार.
अग गं विंचू चावला
देवा रे देवा विंचू चावला
आता काय मी करू विंचू चावला
त्याच क्षणी श्रद्धा चिन्मयला म्हणाली दादा, हे आपण टीव्हीवर ऐकलेले आहे, याला काय म्हणतात? आपण बाबांना विचारू असे म्हणत दोघेही बाबांना विचारू लागले. तेव्हा संजय सांगू लागला, आता तुम्ही जे ऐकले आहे त्याला भारूड म्हणतात.
संत एकनाथ महाराजांनी वरील भारुडातून समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट रुढी, परंपरा, व्यसनांवर प्रहार व भाष्य केले आहे. संत एकनाथ महाराजांचे भारूड त्याच पद्धतीचे असून अध्यात्मिक जोड देऊन ते रंगवून समाजाला सांगतात. त्यातून संदेश देण्याचे कामही केले आहे.
मुलांनो, लक्ष देऊन या लोककलेबद्दल ऐका.
धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साध्या रूपकाद्वारे पद्य वाङ्मयाचा प्रकार म्हणजे ‘भारूड’ महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग, हा गीत प्रकार होता. कालमानानुसार रूप बदलून जानपद वाङ्मय भारूड स्वरुपात आले असावे. भारुडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळीत म्हणतात आणि लळीतातून रूपकाचा जन्म झाला, अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतू हाच होता. ‘बहुरूढ’ या शब्दाचा अपभ्रंश भारूड झाला, असेही काहींचे मत आहे.
‘भारूड’ हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत ‘भारूड’ हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही, त्यामुळे ‘भारूड’ या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारुडाचे आद्य रचनाकार असावेत, असा एक प्रवाह मानतो. संत एकनाथ महाराजांनी ‘भारूड’ या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचवले.
संत एकनाथांनी लोकांना जीवनाच्या विविध पैलूंचे ज्ञान देण्यासाठी भारुडाची रचना केली.
त्यांनी विविध विषयांवर 300 भारुडे लिहिली. ही कथात्मक गाणी आहेत, दुहेरी अर्थ असून त्यातील एक ‘अध्यात्मिक भारूड’ असा आहे. अभिनय, संगीत कलेचा प्रकार म्हणजे ‘भारूड’. भारुडामधून लोकांपर्यंत एक चांगला संदेश जात असत.
संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव या संत एकनाथपूर्व तसेच संत तुकाराम व समर्थ रामदास या संत एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली. एकनाथ महाराजांच्य भारुडात विविधता आहे. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.
संत एकनाथांच्या भारुडात अध्यात्मिक अनुभव सोप्या भाषेत तर सदाचार व नीती यावर कळणारी भाषा व पेलवणारे तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या भारुडात अध्यात्म, मनोरंजन, दोष, दुर्गुणांचे भजन तसेच गूढ गुंजन आहे. संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे ते संत वाङ्मयात भारुडाचे. भारुडात नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.
मुलांनो, तुम्हाला भारूड ऐकल्यावर आनंद झाला आणि काहीतरी समजतेय हे जेव्हा तुमच्या लक्षात आले तर ते समजणे जे आहे तेच भारुडाचे वैशिष्ट्य आहे. भारुडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नातीगोती, सामाजिक वृत्ती दर्शन, गाय, पशुपक्षी, सण आदी बाबी विविध विषय एकनाथांच्या भारुडात दिसून येतात. भारुडामध्ये साधारणपणे 1) भजनी भारूड 2) सोंगी भारूड आणि 3) कूट भारूड असे तीन प्रकार मांडले जातात. त्याच्यापैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे त्याचा अर्थ लावावा लागतो जसे
चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले,
कळस मग पाया रे
किंवा मुंगी व्याली शिंगी झाली.
तिचे दूध किती…..
सारख्या कूटरचना लिहिल्या.
एकनाथ महाराजांनी साडेचारशे वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रुपके सध्यासुद्धा त्याचप्रमाणे
सत्वर पाव ग मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
समाजात एकलकोंडी जीवन जगणार्या स्त्रीचे कुटुंबाविषयीचे मनोगत व्यक्त करणारे भारूड आहे.
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडाची रचना केली. भारूड हे नुसते गाणे नसून ते संपादनही करावे लागते. भारुडात ब्रह्मज्ञानाला गोष्टींचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती नटही असावी लागते. दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यामुळे जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोकशिक्षणाचे, स्वधर्म जागृतीचे कार्य भारुडातून केले आहेत. परमार्थाचा आनंद घेता यावा, अध्यात्म सुलभ व्हावे म्हणून भारुडाची व्यवस्था केली. हा एक वारकरी कलाविष्कार असून भारूड पूर्वी फक्त पुरुषच सादर करत असत; परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. ‘संत साहित्याच्या अभ्यासक’ स्त्री भारुडकर्त्या भारुडे सादर करत आहेत. त्यातील एक म्हणजे प्रकाश पवार यांनी लिहिलेले रंजना शिंदे सादर करतात.
बाई सुया घे गं
दाभण घे
दाताचं दातवन घ्या गं तुम्ही
कुंकू घ्या कुणी दाभण घ्या
डोक्यावर भली मोठी टोपली घेऊन काही महिला रोजच्या वापरातील महत्त्वाचे सामान घेऊन खेडोपाडी विकायला जात असे त्यावरचे हे भारूड आहे.
संत एकनाथ महाराज यांची भारुडे लोकप्रिय होण्याची चार कारणे म्हणजे विविधता, नाट्यत्मता, विनोद आणि गेयता.
इतरही अनेकांनी चांगली भारुडे लिहिली. यामध्ये निरंजन भाकरे यांचेही प्रसिद्ध भारूड म्हणजे
तुला बुरगुंडा होईल गं
तुला बुरगुंडा होईल बया गं
तुला बुरगुंडा होईल
मला बी बुरगुंडा होईल, तुला बी होईल
बुरगुंडा म्हणजे ज्ञान आणि ते सर्वांना व्हावे या अर्थाने हे बुरगुंडाचे भारूड लिहिले आहे.
टाळ, मृदुंग, पेटी, चाळ व आवश्यकतेनुसार विविध साहित्य वापरून भारूड सादर केले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन व भारुडाला भागवत धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आध्यात्मिक, ज्ञान वाढवणारे, समाज प्रबोधनाचेपण आहे आणि असे हे भारूड आता लोप पावत चालले आहे. ते जपण्याचे काम आपण केले पाहिजे, म्हणून आपली लोककला भारूड आपण जपूयात. हे भारूड तुम्ही पण शिका. चला पुढे पुढच्या लोककले




