मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयावरील छाप्यात एका भ्रष्ट क्लार्कला ताब्यात घेण्यात आले आहे. झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तब्बल ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र ढेरंगे या कर्मचाऱ्याला एसीबीने अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मेडिकल लायसन्सचे (वैद्यकीय परवाना) निलंबन रद्द करून देण्यासाठी आरोपीने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. आपापसातील तडजोडीनंतर लाचेची रक्कम ३५ हजार रुपये ठरवण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी ६.०६ च्या सुमारास ढेरंगेने आपल्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत असताना आपली बाजू मांडली.
संपादकीय : १३ फेब्रुवारी २०२६ – जनहितार्थ निर्णय
ते म्हणाले, “मी दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जो काही प्रकार झाला, तो अतिशय चुकीचा होता. असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून काम करतात. सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. ते मुळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत. त्यांना उसनवारीवर या विभागात घेतले होते. त्यांच्याकडून हा प्रकार घडला. या प्रकाराला कुठेही पाठिशी घालणार नाही.”
सदर कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास माहीत नव्हता का? या प्रश्नावर बोलताना झिरवाळ म्हणाले की, माझ्यासमोर या कर्मचाऱ्याची तक्रार यापूर्वी कधी आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असली तरी सरकारी कर्मचाऱ्याने अशाप्रकारे पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले आहेत तर त्याची शिक्षा आता संबंधित व्यक्तीला भोगावी लागेल.
तुमच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, असा प्रश्न विचारला असता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, तसे जर माझ्यापर्यंत धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. या भ्रष्टाचाराचे माझ्याशी संबंध असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असेही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.





