मुंबई | Mumbai
आयएएस तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. दूध, पनीर, तेलासह अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली असून अनेक जणांचे परवाने निलंबित केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या मोहिमेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुकाराम मुंढेंबाबत काय म्हणाले?
महाराष्ट्रात ठिकठिकाणी एफडीएकडून धडक कारवाई सुरु आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एफडीएच्या कारवाईचे कौतुक केलं. भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरु आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही एफडीएची अशी धडक कारवाई सुरु राहील, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
तुकाराम मुंढेंची शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी (Vimal Pan Masala) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापानांवर कारवाई करुन भेसळयुक्त माल पकडला जात आहे किंवा हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरुन संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. आता एफडीएने बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.




