मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावरून राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु झाल्या. या भेटीमुळे पुन्हा एकदा फडणवीस हे दिल्लीत जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, अशा शब्दांत विरोधकांना ठणकावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (सोमवारी दि. १७) दिल्ली दौऱ्यात त्यांच्या देशाच्या राजधानीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आपल्या भावना व्यक्त करत असतानाच देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील असं म्हटलं आहे.
मूळ घर आवरावे लागते, त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुखांपर्यंत अनेक लोकं महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही पाहिले आहे. दिल्लीमध्ये जायचे असेल तर मूळ घर आवरावे लागते, त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो. स्थिरस्थावर करावे लागते, कुटुंबियांची व्यवस्था करावी लागते. देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात राहण्याची खूप इच्छा असेल, पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना दिल्लीत ढकलत आहेत त्यांचे काय? अनेकांनी त्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांच्यासोबतच्या नेत्यांना कधी ते दिल्लीत जातात आणि कधी त्यांची जागा आपल्याला मिळते असे वाटत आहे.” असे म्हणत टोला लगावला. “आम्ही चांगल्या भावनेतून म्हणत आहोत की, तुम्ही दिल्लीचे नेतृत्व केले पाहिजे. महाराष्ट्रामधील नेत्याने राष्ट्राचे नेतृत्त्व करावे असे आम्हाला वाटते.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पकडून भारताच्या निवडणुक प्रक्रियेचे तोंडभरून कौतूक, म्हणाले, भारताकडून…
ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही त्यांच्या जागी बसतो, असे बरेच लोक आहेत, जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शाहांना भेटतात जाऊन सारखे, आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा, हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, अशा शब्दांत विरोधकांना ठणकावतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १७) दिल्ली दौऱ्यात त्यांच्या देशाच्या राजधानीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. महाराष्ट्रातील विविध विकासकामे व महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटींनंतर त्यांनी पत्रकारांना दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना आपली दिल्लीत नियुक्ती होणार असल्याची चर्चा असल्याबाबत प्रश्न केला. यावर फडणवीस म्हणाले, अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल वेगवेगळी चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या. महाराष्ट्राच्या जनतेसह माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे.




