घोटी | वार्ताहर | Ghoti
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नागपुर ते मुंबई (Nagpur to Mumbai) समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) लाभदायी ठरणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज (गुरुवार) दि. ५ रोजी इगतपुरी येथील समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे (Igatpuri to Aamne) या ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी पुढे ते म्हणाले की, “महायुती सरकारसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आमचे २०१४ नंतर सरकार आल्यावर जे स्वप्न आम्ही पाहिले ते पूर्ण झाले. हा महामार्ग नसून समृध्दी करणारा आहे. या महामार्गाला २४ जिल्हे जेएनपिटी सोबत जोडले असून, लवकरच वाढवण बंदराशी जोडला जाईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्यात लोकार्पण झाले असून, आज शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले” असे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले.
तसेच “या महामार्गावर वेगवेगळया रचना केल्या असून, वन्यजीवांचे संरक्षणासाठी ३२ मुख्य पूल आहेत. तर ६० ओव्हरपास व अंडर पास आहेत. तसेच एकूण ७ बोगदे केले आहेत. इगतपुरी ते कसारा बोगदा आठ किलो मीटरचा असुन देशातला सगळ्यात मोठा हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये फायर सिस्टिम असून तापमान ६० वर गेले की पाऊस चालू होतो आणि ३० वर आल्यावर बंद होतो. स्थानिक प्रजातींची ३३ लाखांहून अधिक प्रजाती झाडे लावण्यात आली आहे. मी कालच वन विभागाला आदेश दिले की पालखी मार्ग असेल महामार्ग असेल या ठिकाणी झाडे लावावे”, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “समृद्धी महामार्ग हा राज्यातील गेम चेंजर प्रकल्प आहे. सुरुवातीला वाटत होते हा रस्ता होईल का नाही कारण काही लोकांनी अडथळे आणले होते. या महामार्गाला जवळपास ३९२ गावे जोडले आहे. हा रस्ता नसून, कृषी समृद्धी प्रकल्प व पर्यावरण पुरक प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना, लोकांना याचा फायदा झाला असून, ३३ लाख झाडे या रस्त्यावर लावणार आहोत. आमची सर्वांची इच्छा होती रस्ता झाल्यावर याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करावे. मात्र, काही लोकांनी अडथळे आले. मात्र तरीही नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच लोकार्पण झाले.आता सगळीकडे उद्योग येतील आणि प्रगतीला चालना मिळेल. आता मुंबई नागपूर अधिवेशनाला लोक या समृद्धी महामार्गावरून येतील”, असेही त्यांनी सांगितले.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलतांना सांगितले की, “आज जागतिक पर्यावरण दिन असून, कालच राज्याचे मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन केले. यावर्षी आम्ही १० कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी २५ कोटी वृक्ष लावण्याचा आमचा ध्यास आहे. समृद्धी महामार्गाला सुरवातीला शेतकऱ्यांनी (Farmer) विरोध केला मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जमिनींचे दर जाहीर केले त्यावेळी विरोध संपला. म्हणून आज आपण या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करत आहोत. लवकरच पुणे -मुंबई रस्त्याचे काम करणार असून, या महामार्गावरही बोगदा होणार आहे. १२ कोटी सिमेंटच्या बॅग या महामार्गाला लागल्या. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला सुरुवात केली आणि त्याच देवेंद्रजींनी शेवट केला. या समृध्दी महामार्गात एकनाथ शिंदे यांचे हातभार आहे ते नाकारता येणार नाही”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, याप्रसंगी व्यासपीठावर अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड, अप्पर सचिव मनीषा पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार काशीनाथ मेगाळ पांडुरंग गांगड,उदय जाधव, युवानेते संजय खातळे, पांडुरंग वारुंगसे, सुनील जाधव, संपत वाजे, दिलीप जाधव यांनी केले.