येवला |प्रतिनिधी| Yeola
चांगली समाजनिर्मिती ही कार्याची प्रेरणा ठेऊन समाजातील व्यथा दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.
येवला (Yeola) तालुक्यातील वडगाव बल्हे येथील अनुगामी लोकराज्य अभियानाच्यावतीने ‘कापसे फाऊंडेशन अनुलोम संगम २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, पद्मश्री दादा लाड, अतुल वझे, अनुलोम प्रमुख स्वानंद ओक, सुजाता मराठे, अंबादास जोशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून स्वामी विवेकानंदांच्या संदेशाला अनुसरून काम करीत आहेत. ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. अनुलोमने प्रगतिशील समाजामध्ये उभे केलेले कार्य महत्वाचे आहे. उत्तम, सुंदर आणि बहुमोल कार्य अनुलोमच्या माध्यमातून होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार करण्याचे क्षेत्र अनुलोमने निवडले आहे.
समर्पणाची भावना असेल तरच अनुलोमचे काम करता येणे शक्य आहे. त्यामुळेच यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे महत्व आहे. हा परिवार मोठा होत गेला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुलोमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम प्रमुख स्वानंद ओक यांनी केले. यावेळी पद्मश्री दादा लाड आणि कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे तसेच अनुलोमच्या कामात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जनसेवकांचा सत्कारही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कापसे पैठणी उत्पादन कक्षाला भेट दिली. यावेळी कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांनी हातमागावरील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असलेले चित्र भेट दिले. यावेळी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली.





