सांगली | Sangli
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज (दि. 20 जानेवारी) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरु होते. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. समीर गायकवाडच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी धडकताच कुटुंबावर शोककळा पसरली.
कोण आहे समीर गायकवाड?
समीर गायकवाड हा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात झालेल्या गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात तो मुख्य संशयित होता. पानसरे हत्येनंतर सात महिन्यांनी, म्हणजेच १६ सप्टेंबर २०१५ रोजी त्याला सांगलीतून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडे अनेक मोबाईल सिमकार्ड जप्त केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि पुराव्याअभावी २०१७ मध्ये त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास पुढे राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला होता, ज्यामध्ये समीरसह इतर ९ जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




