चंद्रपूर | Chandrapur
राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध भागातील जमीनी लाटल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण त्यानंतर नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात महार वतनाची सुमारे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप झाला होता. अशात आता विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये २०० कोटींची जमीन ३ कोटी रुपयांना लाटल्याचा आरोप केला आहे.
विजय वडेट्टीवारांनी काय आरोप केला आहे?
माझ्याकडे एक प्रकरण आले आहे. यासंदर्भात मी उद्या सविस्तर माहिती देणार आहे. सर्व्हेनंबरसह माहिती देतो. आपण यातही लक्ष घालावे. या राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे. मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मिराभाईंदरमधील ४ एकर प्राइम लँड, जिची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? आणि जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा…! असे म्हणायची वेळ आता आली आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “राज्यामध्ये घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुण्यात जमिनीशी संबंधित प्रचंड मोठे घोटाळे होत आहेत. यामध्ये १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घोटाळ्यांचा समावेश आहे. बिल्डर, डेव्हलपर आणि राजकारण्यांनी जमिनी बळकवण्याचा सपाटा लावला आहे. आज हा करार रद्द झाला, या करारामध्ये समावेश असणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. परंतु, मूळ प्रश्न असा आहे की, कंपनीचा जो मालक आहे, तो सुद्धा यामध्ये दोषी आहे. त्याच्यावरही कारवाई व्हावी. ज्या पद्धतीने दिग्विजय पाटील आणि सब-रजिस्ट्रारवर कारवाई झाली, उद्या उद्योग संचालनालयावर होईल. या व्यवहारात महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सूट दिली, ते सुद्धा दोषी आहेत.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




