मणिपूर | Manipur
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसा उफाळली आहे. रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे.
नेमके काय घडलं?
मोइरांग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ट्रोंगलाओबी अवांग लेइकाई येथे सोमवारी रात्री सुमारे १ वाजता कुकींच्या एका गटाने घरावर रॉकेट हल्ला केला. या स्फोटात ५ वर्षांचा मुलगा आणि ५ महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलांची आई गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही मुलांना रुग्णालयात नेले असता दोघांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर घाटी जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण झालं आहे. संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. विष्णूपूर जिल्ह्यात दोन टँकर आणि लोखंडी सळ्यांची भरलेल्या ट्रकला आग लावण्यात आली. या घटनेनंतर अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खोऱ्यातील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.
लोकांनी मोइरांग पोलीस ठाण्याबाहेर जमत रॉकेट हल्ला करणाऱ्या कुकींच्या गटाविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. लोकांच्या एका गटाने विष्णूपूर आणि चुराचांदपूर सीमेवर असेल्या सीआरपीफच्या कॅम्पवर हल्ला केला. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून गोळीबार आणि अश्रूधुरांचा मारा करण्यात आला. यात १९ जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.
संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्फोट आणि हिंसाचाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.





