अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बंगालच्या उपसागरात सेन-यार व दिट-वाह अश्या दोन चक्रीवादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चढ-उतारासहित 7 डिसेंबर संकष्ट चतुर्थीपर्यंत महाराष्ट्रात अपेक्षित थंडी अनुभवली गेली. आता पुढील 12 दिवस म्हणजे 19 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, खान्देश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात रात्री व दिवसा हुडहुडी जाणवणार आहे.
राज्यातील थंडीबाबत पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्याची मालेगाव (नाशिक) येथे किमान तापमान 9 अंश तर कमाल तापमान 26.8 आहे. तर अमरावती, यवतमाळ, गोंदिया, वाशिम जिल्ह्यात थंडीची लाट आहे. तर एकांकी किमान तापमान व केवळ जाणवणारी थंडी ही अहिल्यानगर 9.5, जळगाव 9.4, जेऊर 9, छत्रपती संभाजीनगर 10, नांदेड 9.9, नागपूर 9.6 अंश आहे. उत्तर भारतातून येणारे ईशान्यई वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून हवेचा दाब ही पूर्ववत म्हणजे 1016
हेक्टपास्कल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते. दक्षिण भारतातील ईशान्य (हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी होण्याच्या शक्यतेमुळे तेथील हंगामी पूर्वीय वारे 13 अंश अक्षवृत्ता दरम्यानच मर्यादित राहण्याच्या शक्यतेमुळे, उत्तर भारतातून महाराष्ट्रात येणार्या थंडीला अटकाव होण्याची शक्यता नाही. वायव्य आशियातून, सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी (झंजावात) प्रकोप त्यामुळे थंड ईशान्यई वारे महाराष्ट्राकडे झेपावत आहे.
समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी उंचीपासून ते पार साडेचार किमी उंचीपर्यन वरून खाली (व्हर्टिकली डाऊन) टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्चिमी अतिथंड कोरडे वार्यांचा झोता (जेट स्ट्रीमचा) पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे (हॉरिझॉनंटली लॅटरल) म्हणजे 39 डिग्री उत्तरपासून ते पार 22 डिग्री उत्तर अक्षवृत्तपर्यंत रुंदावल्यामुळे महाराष्ट्रात थंडीची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले.




