औरंगाबाद – aurangabad
ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झालेल्या २२ तक्रारदारांचे १३ लाख १७ हजार रुपये सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले. ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात सणासुदीच्या काळात भामट्यांनी अनेकांना बक्षीस मिळाल्याचे तसेच विविध ऑफरचे आमिष दाखवून गंडा घातला होता. फसवणूक झालेल्यांनी तात्काळ सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात धाव घेतल्याने त्यांचे पैसे परत मिळवून देण्यात यश आले असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यात स्वातंत्र्य दिन, राखीपौर्णिमा, गणेशोत्सव आणि विजयादशमी या सणासुदीच्या काळात अनेकांनी ऑनलाईन खरेदी करण्यावर भर दिला होता. या काळात सक्रीय झालेल्या सायबर भामट्यांनी शहरातील अनेकांना विविध आकर्षक ऑफरचे आमिष दाखवून तसेच बक्षीस मिळाल्याचे सांगत गंडा घातला होता.
त्यापैकी फसवणूक झालेल्या २२ जणांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावर सतर्क झालेल्या सायबर पोलिसांनी भामट्यांचे बँक खाते फिज करून, तक्रारदारांची ऑनलाईन फसवणूक झालेली १३ लाख १७ हजार रूपयांची रक्कम परत मिळवून दिली. पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल दुमे, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोलिस अंमलदार सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, शाम गायकवाड, संदीप पाटील, गोकुळ कुतरवाडे, जयश्री फुके, छाया लांडगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी कळविले आहे.
आमिषाला बळी पडू नका
सणासुदीच्या काळात सायबर भामठे विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर असल्याचे संदेश सोशल मिडियावर पाठवून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. या
काळात नागरिकांनी सतर्क राहुन कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकवर खासगी माहिती देऊ नये असे सायबर पोलिसांनी
कळविले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधून सायबर गुन्हेगारीला आळा घालावा, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.