Friday, May 30, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : ३० मे २०२५ - किती ताण घेणार?

संपादकीय : ३० मे २०२५ – किती ताण घेणार?

महिला आणि ताणतणाव यांचे नाते बहुधा तिच्या जन्मापासूनच जुळत असावे. मुलगी झाली म्हणून अनेक पालकांना ताण येतो. मुलगी जसजशी मोठी होते तसतसा तिला सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो. समाजरचनेतील दुय्यमत्वाचा ताण बहुसंख्य महिलांना त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सहन करावा लागतो. तथापि याच ताणतणावामुळे महिलांमध्ये भावनिक स्थितीत वारंवार बदल (मड स्विंग्ज) होण्याची समस्या वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ज्ञ नोंदवतात.

- Advertisement -

ही समस्या विविध प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांची जननी ठरण्याचा धोकाही त्या वर्तवतात. महिलांना किती प्रकारचा ताण सहन करावा लागतो याची नुसती नोंद घ्यायची ठरवली तरी ती यादी कदाचित मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच जाऊ शकेल. अर्थात, पुरुषांनाही ताण असतातच. त्यांनाही मानसिक समस्या जाणवतात. तथापि समाजरचनेमुळे महिलांना अंमळ जास्तच ताण सहन करावा लागतो हे वास्तव आहे.

याची अनेक कारणे सांगितली जातात. जसे की, कौटुंबिक पातळीवर चढउतार, आप्तांचे मृत्यू, मुलांमधील अस्थिरता, नोकरीच्या ठिकाणचे वातावरण आणि वर्तणूक, मासिक पाळी, त्यामुळे होणारे संप्रेरकांमधील बदल, रजोनिवृत्ती इत्यादी इत्यादी. पण यामध्ये महिलांनाही स्वतःला दुय्यम मानायची लागलेली सवय प्रमुख कारण मानले जायला हवे. परिणामी कोणत्याही पातळीवर त्या स्वतःला प्राधान्य देत नाहीत. त्याची सुरुवात आहार-विहारासारख्या प्राथमिक स्तरापासून केली जाऊ शकेल.

पात्रता आणि क्षमता असूनही ठरवून स्वतःला दुसर्‍या स्थानावर ठेवणे अवघडच असते. हे सोंग सर्वात जास्त ताण निर्माण करते. दुसरीकडे शरीर साथ देत नाही याची चाहूल त्यांच्याशिवाय अन्य कोणाला लागणार? तथापि महिला ते मान्यच करत नाहीत, असेही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. तथापि अशा मानसिकतेमुळे निर्माण होणार्‍या समस्या लक्षात घेता महिलांनी त्यांच्या सवयींमध्ये हळूहळू बदल करणे गरजेचे आहे. छंद जोपासणे, व्यायाम, योगा आणि ध्यान करणे, गाणी ऐकणे, जीवस्यकंठस्य मैत्रिणीशी मनसोक्त गप्पा मारणे, पुरेशी झोप घेणे, दमणे मान्य करणे म्हणजे आपणही दमतो हे स्वतःला बजावणे, नवीन कला शिकणे अशा अनेक उपायांनी महिला त्यांचा ताण कमी करू शकतील.

याचा समग्र अर्थ, महिलांनी त्यांना स्वतःलादेखील महत्त्व द्यायला शिकणे आवश्यक आहे. या बदलांनी कोणत्याही परंपरांना अथवा समाजरचनेला सुरूंग लागणार नाही किंवा त्यांना कोणी वाळीत टाकणार नाही असे त्यांनी स्वतःला बजावणे मात्र अत्यावश्यक आहे. त्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी बदल करणे गरजेचे आहे याची खूणगाठ महिलांनी मारायला हवी. तरच बदलाच्या दिशेने त्यांची पावले पडू शकतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 11 हजार शेतकर्‍यांची 5 हजार 700 हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा व कर्जतसह 9 तालुक्यांत मंगळवारी एकाच दिवसात वादळी वारा, अवकाळी व अतिवृष्टीमुळे तब्बल 171 गावे बाधित झाली असून या...