राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मान्सूनचा अजुनही मागमूस नाही. धरणांच्या पाणलोटात मान्सून दाखल झाला नसल्याने नाशिक जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा चिंताजनक आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र व लाभक्षेत्र मान्सुनच्या प्रतिक्षेत आहे. अल निनोचा प्रभाव मान्सून लांबण्यावर झाल्याने शेतकरी वर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. जून महिना निम्मा उलटूनही मान्सून अजुनही राज्यात दाखल नाही. दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. जलसंपदा विभागाने सिंचनाच्या आवर्तनाला ब्रेक दिला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी पुरवायचे असल्याने जलसंपदाने राज्यभर हे पाउल उचलले आहे. गोदावरीच्या लाभक्षेत्रात यामुळे चिंता निर्माण झाली आहे.
नगर, नाशिक तसेच मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांना पाणी पुरवठा करणारी नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकच्या 23 लहान मोठ्या प्रकल्पात अवघा 21 टक्के उपयूक्त पाणी साठा आहे. गेल्या वर्षी कालच्या तारखेला तो 27 टक्के होता. अर्थात मागील वर्षी मान्सुनचे वेळेवर आगमनही झाले होते. यंदा मात्र मान्सून लांबला आहे.
दारणा धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा आहे. सध्या या धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तनासाठी 650 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. मुकणे धरणात 22.50 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. वाकीमध्ये 4.17 टक्के, भाममध्ये 0.65 टक्के, भावली प्रकल्पात 17.92 टक्के, वालदेवी 36.54 टक्के, गंगापूर 32.98 टक्के, कश्यपी 28.35 टक्के, गौतमी गोदावरी 75.43 टक्के, कडवा 17.59 टक्के, आळंदी 5.64 टक्के, भोजापूर 0.83 टक्के असा पाणीसाठा आहे.
धरणांच्या पाणलोटात 3 जूनला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला होता. दारणाना 20 मिमी, मुकणे 23 मिमी, वाकी 7 मिमी, भाम 27 मिमी, भावली 69 मिमी, वालदेवी 10 मिमी, गंगापूर 38 मिमी, कश्यपी 40 मिमी, गौतमी गोदावरी 3 मिमी, पालखेड 10 मिमी, भोजापूर 3 मिमी, नाशिक 21 मिमी, त्र्यंबक 7 मिमी, ओझर 27 मिमी आणि पिंपळगाव 2 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसाचे आगमन नाहीच.
दारणा धरणातून बिगर सिंचनासाठी 650 क्युसेकने, गंगापूर मधुन 300 क्युसेकने, मुकणे धरणातून 800 क्युसेकने, वालदेवीतून 300 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर नांदूर मधमेश्वर बंधार्यातून कालच्या आकडेवारी नुसार गोदावरी उजव्या कालव्यातून 500 क्युसेकने, डावा कालवा 300 क्युसेकने तर वैजापूर गंगापूरच्या दिशेने जाणारा जलद कालवा 800 क्युसेकने सुरु आहे. सिंचनाचे आवर्तन होणार नसल्याने पिण्याच्या पाण्याचे आवर्तन करुन कालवे बंद केले जाणार आहेत. 2 ते 3 दिवसात बिगर सिंचनाचे आवर्तन पूर्ण होईल.




