राहाता |तालुका प्रतिनिधी)|Rahata
काल शनिवारी दिवसभर दारणा, गंगापूरच्या पाणलोटात संततधार सुरुच होती. दारणात 24 तासात 604 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी दारणा 45.75 टक्के भरले होते. आज सकाळी ते 50 टक्क्यांवर पोहचणार आहे. गोदावरीत 3228 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.
गंगापूर धरणात काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात 462 दलघफू नविन पाणी दाखल झाले.गंगापूर धरण 36.07 टक्के भरले आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासात गंगापूर च्या भिंतीजवळ 141 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणाच्या पाणलोटातील अंबोलीला 128 मिमी पावसाची नोंद झाली. तर त्र्यंबक ला 93 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणात 40 टक्के साठा आज रविवारी सकाळी 6 पर्यंत होईल.
गंगापूर समुहातील कश्यपी धरणाच्या भिंतीजवळ 159 मिमी, गौतमी गोदावरीच्या भिंतीजवळ 102 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी धरणात 21.98 टक्के, गौतमी मध्ये 28.29 टक्के पाणी साठा आहे. काल या धरणांच्या परिसरात संततधार सुरुच होती. शनिवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत 11 तासात दिवसभरात गंगापूरला 26 मिमी, कश्यपीला 35 मिमी, गौतमीला 27 मिमी, त्र्यंबक ला 50 मिमी, अंबोलीला 34 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे गंगापूर मध्ये नविन पाणी दाखल होणार आहे.
दारणाच्या पाणलोटातही संततधार सुरु आहे. घोटी, इगतपुरी च्या घाटमाथ्यावर पावसाचे जबरदस्त आगमन झाले आहे. आज सकाळ पर्यंत दारणा 50 टक्के होईल. काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत दारणाच्या भिंतीजवळ 22 मिमी पावसाची नोंद झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात काल सकाळी 6 वाजेपर्यंत 3271 दलघफू पाणीसाठा झाला होता. 24 तासात दारणात अर्धा टिएमसी हुन अधिक (605 दलघफू )पाणी नव्याने दाखल झाले. तर 1 जून पासुन या धरणात सव्वादोन टिएमसी (2289 दलघफू ) एकूण पाणी नव्याने दाखल झाले.
काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 48 मिमी, इगतपूरीला 92 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी ची माहिती उपलब्ध होत नाही. मात्र तेथेही इगतपूरी सारखी परिस्थिती आहे. शेजारील भावली धरणाच्या परिसरात जोरदार संततधार सुरु आहे. 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद या धरणाच्या भिंतीजवळ झाली होती.भावलीत 44.42 टक्के पाणी साठा झाला होता. आज सकाळ पर्यंत या धरणाचा साठा 50 टक्क्यांवर पोहचु शकतो. 1 जून पासुन या धरणाच्या परिसरात 1131 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गोदावरीत 3228 क्युसेकने पाणी विसर्ग काल रात्री 9 वाजता करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी वाहती झाली आहे. वरील कोणत्याही धरणातुन पाणी सोडण्यात येत नसल्याने जो पर्यंत पावसाचा जोर आहे, तो पर्यंत नदी वाहती राहु शकते. धरणे अद्यापि रिकामी असल्याने 70 टक्क्यांच्या पुढे सरकल्यावर त्यातुन विसर्ग होवु शकतो.
अन्य धरणांचे साठे- मुकणे- 43.45 टक्के, वाकी 2.25 टक्के, भाम 19.48 टक्के, वालदेवी 9.89 टक्के, कडवा 27.25 टक्के, आळंदी 15.93 टक्के, पालखेड 48.24 टक्के असे साठे काल सकाळी 6 पर्यंत होते. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 28.04 टक्के पाणी साठा झाला आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 23.05 टक्के इतका होता.
दरम्यान काल सकाळी संपलेल्या 24 तासात कोपरगावला 9 मिमी, ब्राम्हणगावला 3 मिमी, पढेगावला 5 मिमी, सोमठाणा 10 मिमी, कोळगाव 4 मिमी, राहाता 6 मिमी, रांजणगाव 5 मिमी, तर चितळी 17 मिमी पावसाची नोंद झाली. काल दुपारनंतर भिज पावसाने सर्वत्र हजेरी लावली.




