राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता व कोपरगाव तालुक्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून असणार्या नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूर, कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव या धरणांच्या मधून विसर्ग सुरू झाला आहे. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 7924 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.
काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढल्याने या धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. दारणा धरण 79.30 टक्के भरले. पाणलोटात संततधार असल्याने दारणा धरणातून काल सकाळी 11 वाजता 550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. विद्युत प्रकल्पाच्या दरवाजातून पाणी सोडण्यात आले. काल सायंकाळी हा विसर्ग 1100 क्युसेक इतका करण्यात आला. धरणाच्या दिशेने भावली धरणातूनही विसर्ग सुरू आहे. भावली 2 दिवसांपूर्वी 100 टक्के भरले आहे. भावलीतून विसर्ग वाढला, तो 1509 क्युसेक इतका झाला. भावलीच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहत आहे. कडवा धरणातूनही 1554 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाच्या संततधारेमुळे नवीन पाण्याची आवक वाढली. त्यामुळे गंगापूर मधून काल दुपारी 3 वाजता 199 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर गौतमी गोदावरी धरणातूनही 1000 क्युसेकने विसर्ग गंगापूरच्या दिशेने सुरू आहे. पुणेगाव, पालखेड या धरणातूनही विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. पालखेड मधून 2052 क्युसेक, पुणेगाव मधून 702 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.
दरम्यान वरील धरणांचे पाणी खाली पूर्ण क्षमतेने भरलेल्या नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल झाल्यानंतर या बंधार्यातून काल सकाळी 11 वाजता 1614 क्युसेकने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत विसर्ग सोडण्यात येत आहे. दुपारी 3 वाजता तो 4769 क्युसेक करण्यात आला. काल सायंकाळी तो 7924 क्युसेकने सुरू होता. या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अगोदर जायकवाडीच्या दिशेने 4.1 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान काल दिवसभरात काही ठिकाणी पावसाचा जोर टिकून होता. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या 12 तासांत भावलीला 72 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 12 मिमी, भाम ला 45, मुकणे 15, वाकी 23, वालदेवी 9. गंगापूर 24, त्र्यंबक 25, आंबोली 51, कश्यपी 23, गौतमी 66 मिमी अशी पावसाची नोंद झाली.




