मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नर तालुका दौऱ्यात (Sinnar Taluka Tour) नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान केले होते. यावरून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
यानंतर शुक्रवार (दि.३०) रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये अ.भा.बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलतांना ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून, अजित पवार यांनी मला हे खाते जाणीवपूर्वक दिले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे मंत्री कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोकाटे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या विधानांनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे कान टोचत सल्ला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांना काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या (Farmer) बाबतीत अशाप्रकारची वक्तव्ये टाळा. शेतकरी आपला बळीराजा आहे, लाखांचा पोशिंदा आहे. सर्व गोष्टी आम्हालादेखील माहिती आहेत. आम्ही देखील शेतकरी आहेत. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? त्या मनात ठेवायच्या असतात. पण, कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला महागात पडते आहे”, असे त्यांनी म्हटले.
कोकाटेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण
दोन दिवसांपूर्वी कोकाटे यांनी बोलतांना “कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं अजित पवारांनी जाणीवपूर्वक दिलं आहे”, असे म्हटले होते. यावर स्पष्टीकरण देतांना कोकाटे म्हणाले की, “मी असं काही बोललोच नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. फळबागांचे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात कांद्याच्या पिकाचंही नुकसान झाले आहे. जेवढं नुकसान झाले आहे, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. हे नैसर्गिकच आहे. सोयाबीन आणि कापसाचे पिक फारसे उरलेले नाही. उभ्या असलेल्या फळबागा महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचे पंचनामे करणे गरजेचे आहे”, असे त्यांनी सांगितले होते.