मुंबई | Mumbai
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. येत्या ६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का देत निर्णय घेतला आहे.
अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसे पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे. यंदाचा अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.





