Monday, May 4, 2026
HomeराजकीयAmol Mitkari : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची…; अमोल मिटकरींच्या...

Amol Mitkari : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची…; अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

मुंबई । Mumbai

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावरून राजकारण चांगलेच तापले असून, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक दावे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत अत्यंत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. “अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून तर आला नव्हता ना? ‘लिट्टे’ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जशी हत्या केली, तसाच कट अजित पवारांच्या बाबतीत रचला गेला का?” असा खळबळजनक सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.

- Advertisement -

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस फाटा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी या प्रकरणातील अनेक तांत्रिक बाबींवर बोट ठेवले. ते म्हणाले की, या अपघाताबाबत मोठे गूढ निर्माण झाले असतानाही महाराष्ट्र इतका शांत कसा आहे, हेच समजत नाही. अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले शिवविचारांचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मिटकरी यांनी यावेळेस तपासातील त्रुटींवरही भाष्य केले. विमानाचे मूळ पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे नेमक्या कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, असा सवाल त्यांनी केला. या दोन्ही पायलटांचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत आणि ते सध्या कुठे आहेत, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गोजूबावीच्या माळरानावर झालेला हा अपघात म्हणजे एक न उलगडलेलं गूढ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, ‘ब्लॅक बॉक्स’चा डेटा येण्यास वेळ लागणार असेल तरी, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज का दिले जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या आठवणीने मिटकरी अत्यंत भावूक झाले होते. “अजितदादांनी मला तीन वेळा तालिकेवर बसवले होते. जेव्हा मी वरती अध्यक्षीय खुर्चीवर असायचो, तेव्हा मुख्यमंत्री खाली बसायचे. माझ्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे, पण यंदाच्या अधिवेशनात दादा सोबत नसतील याची टोचणी मनाला लागली आहे,” असे ते म्हणाले. दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दादांना भेटण्याची पद्धत होती, पण आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाचा शोक प्रस्ताव पाहावा लागणार आहे, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात अजित पवारांसाठी मांडला जाणारा शोक प्रस्ताव हा आपल्यासाठी अत्यंत कठीण प्रसंग असल्याचे मिटकरींनी सांगितले. “शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील. माझ्यासारखा कमनशिबी आणि दुर्दैवी माणूस दुसरा कोणी नसेल, ज्याला आपल्या लाडक्या नेत्याचा शोक प्रस्ताव त्याच सभागृहात ऐकावा लागत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...