नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) या पर्यटनस्थळी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली असून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘जशास तसं उत्तर’ दिले जाईल, असे म्हणत दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, “पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात (Attack) आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानुष कृत्याने आम्हा सर्वांना दुःख आणि वेदना झाल्या आहेत. सर्वप्रथम ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो”, असे त्यांनी म्हटले.
#WATCH | #PahalgamTerrorAttack | Delhi: Raksha Mantri Rajnath Singh says, "We lost many innocent lives in the cowardly act in Pahalgam. We are deeply distressed. I express my condolences to the families who lost their loved ones… I want to repeat India's resolve against… pic.twitter.com/OhuX8rkghy
— ANI (@ANI) April 23, 2025
तसेच “देशवासियांना मी आश्वासन देतो की, पहलगाम घटनेवर भारत सरकार (India Government) आवश्यक ते सर्व पाऊले उचलेल. आम्ही फक्त हे कृत्य करणाऱ्यांवरच कारवाई करू असे नाही तर, ज्यांनी पडद्यामागे बसून भारतीय भूमीवर असे नापाक कृत्य करण्याचा कट रचला आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. भारताला अशा दहशतवादी कृत्यांनी घाबरवता येणार नाही. दहशतवाद्यांना ‘जशास तसं उत्तर’ दिले जाईल”, असे राजनाथ सिंह म्हणाले.
संध्याकाळी बैठक
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बुधवारी (२३ एप्रिल २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि लष्कराचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक उपस्थित होते. यानंतर पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज (दि.23) सायंकाळी ६ वाजता सीसीएसची बैठक होणार आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलांना दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली, जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.