नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतान देशाच्या दौऱ्यावर आहेत. ते देशात परतल्यावर दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्या आधी या प्रकरणावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. लाल किल्ल्यावर झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला होता हे स्पष्ट झाले आहे, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत माफ केले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा मिळेल. “या स्फोटाची चौकशी केली जात आहे. चौकशीत जे काही उघड होईल ते लोकांसमोर ठेवले जाईल. मी देशाला खात्री देऊ इच्छितो की या हल्ल्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला.
संरक्षणमंत्र्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. “या घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी पीडितांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो”, असेही ते म्हणाले.
दिल्ली बॉम्बस्फोटाचा कसून आणि वेगाने तपास सुरु असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे नाव सातत्याने समोर येत असल्याने भारत-पाकिस्तानमध्ये संघर्षाची ठिणगी पडणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




