मुंबई | Mumbai
अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. महायुतीला राज्यात १७ जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला युतीमध्ये घेण्याचा निर्णय योग्य होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते, अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाबाबत विचारणा केली, तेव्हा काही तडजोडी तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नसल्या, तरी कराव्या लागतात, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी सर्वकाही सांगितले आहे. आता फक्त इतरांना सांगायचे बाकी आहे. मी एवढेच सांगेन की हे नक्की आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले तेव्हा आमच्या मतदारांना हे अजिबात आवडले नाही. पण आम्ही जेव्हा परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली, ते आमच्यासोबत कोणत्या परिस्थितीत आले, कोणत्या परिस्थितीत आम्ही त्यांना सोबत घेतले हे आम्ही लोकांना सांगितले तेव्हा त्यांना हे लक्षात आले की राजकारणात अनेकदा अशी स्थिती येते जेव्हा आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून ज्या तडजोडी करायला आवडत नाहीत, अशा तडजोडी तुम्हाला कराव्या लागतात. आम्ही तशा तडजोडी केल्या. पण आज आम्ही आमच्या १०० टक्के नाही, पण किमान ८० टक्के लोकांना समजावून देऊ शकलो आहोत की आम्ही हे का केले”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




