नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक विभागातील (Nashik Division) अतिवृष्टीमुळे बाधित (Affected) नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी दिले आहेत.
डॉ.गेडाम यांनी आज नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे (District) जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकार्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी गेडाम यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या (Citizen) घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या असून, घरसामान, जीवनावश्यक साहित्य आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधितांना सुरक्षित स्थळी हलवून निवारा, अन्नपाणी व इतर आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी म्हटले.
शेतकर्यांसाठी तातडीने पंचनामे
डॉ. गेडाम यांनी शेतकर्यांच्या (Farmer) नुकसानीबाबतही जिल्हा प्रशासनाला सजग राहण्याचे निर्देश दिले. शेती पिकांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा आणि शासनाकडून मिळणारे अनुदान विनाविलंब शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, याची खात्री करा, असे त्यांनी सांगितले. तसेच शासनाने उणे प्राधिकारपत्रावरून थेट अनुदान वितरणास मान्यता दिल्यामुळे कोणतीही अतिरिक्त परवानगी न घेता बाधितांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, असेही गेडाम यांनी स्पष्ट केले.
९० कोटींचे अनुदान वितरित
जून ते ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीसाठी शासनाने आधीच अनुदान वितरित केले असून, आतापर्यंत सुमारे ९० कोटी रुपये बाधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत अनुदान वाटपात विलंब होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.





