श्रीगोंदा (प्रतिनिधी)
शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या मुख्य प्रवर्तकासह काही संचालक दुबईला गेले असल्याची माहिती कंपनीच्या एजंटने दिली. दुसरीकडे पैसे दिलेल्या मुदतीत परत न मिळाल्याने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत.
फसवणूक झाल्याचे समजताच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी पैसे परत घेण्यासाठी तगादा सुरु केला आहे. मात्र, कंपनीकडून संदिग्ध माहिती देण्यात येत असून केवळ बनवाबनवी सुरु असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. गुंतवणूकदारांच्या तगाद्यानंतर कंपनीने नवीन अॅप लाँच करत १५ जूनपासून पैसे अॅपच्या माध्यमातून विड्रॉल करता येतील असे आश्वासन दिले. परतू आता पैसे विड्रॉल करण्यासाठी आता आणखी तीन महिने लागणार असल्याची माहिती एंजटने दिली असून कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना गाजर दाखवले आहे.
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला १० ते १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीघ लागली. कुणी पदरचे पैसे गुंतवले, कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले, जमिनी, जागा विकून पैशांची गुंतवणूक केली.
वेळप्रसंगी सावकार, बँकेकडूनकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले. अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले. आता, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसून दिशाभूल केली जात आहे. कंपनीने पैसे परत मागणाऱ्या गुंतवणूकदारांना सुरुवातीला पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले असल्याचे सांगितले. त्यानंतर एका दुसऱ्याच कंपनीत परस्पर पैसे वळविल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पुन्हा कंपनीकडून गुंतवणूकदाराना पैसे अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सांगत वेळ मारून नेण्यात येत आहे.





