जगभरात आज वसुंधरा दिन (Earth Day 2022) साजरा केला जाणार आहे. वसुंधरा ही संपूर्ण विश्वाची माताच आहे. याच मातेच्या अंगा-खांद्यावर खेळणारे आपण सर्वजण खरं तर गुण्यागोविंदानं नांदणं अपेक्षित आहे. मात्र, भौतिक सुखाच्या मागे धावताना आपल्या सर्वांचा तोल सुटत चालला आहे. जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो.
जेव्हा पृथ्वी दिन सुरू झाला तेव्हा तो २१ आणि २२ एप्रिल रोजी साजरा केला जात असे. १९७० पासून तो २२ एप्रिलला साजरा होण्यास सुरुवात झाली.मानवाच्या दृष्टीने पृथ्वीचे महत्त्व अनन्यसाधारण असून, पृथ्वीचे जतन करणे काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे.
आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे.
हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला.
हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे जंगलांची. अगदी शहरी भागातही भरपूर झाडे त्यानुसार सर्व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती आणि संस्थांना विविध बक्षीसेही दिली जातात.