Sunday, July 26, 2026
Homeमहाराष्ट्रIqbal Mirchi : इक्बाल मिर्ची प्रकरणात ED ची मोठी कारवाई; ७०० कोटींची...

Iqbal Mirchi : इक्बाल मिर्ची प्रकरणात ED ची मोठी कारवाई; ७०० कोटींची देश-विदेशातील मालमत्ता जप्त

मुंबई । Mumbai

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ‘फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ अंतर्गत गँगस्टर इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तब्बल ७००.२७ कोटी रुपयांच्या अथांग स्थावर मालमत्तेवर अधिकृतपणे टाच आणली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतातील बेनामी आर्थिक नाड्या आवळण्यात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे.

- Advertisement -

‘ईडी’ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वरळी सारख्या मोक्याच्या ठिकाणच्या तीन प्रमुख आणि आलिशान इमारतींचा समावेश आहे. ‘राबिया मॅन्शन’, ‘मरियम लॉज’ आणि ‘सी व्ह्यू’ अशी या विस्तीर्ण इमारतींची नावे असून, केवळ मुंबईतील या तीन मालमत्तांची बाजारपेठेतील अंदाजे किंमत सुमारे ४९७ कोटी रुपये आहे. मिर्चीच्या काळ्या कमाईचे जाळे केवळ भारतापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते परदेशातही पसरले होते. याचीच पाळेमुळे खणून काढत ‘ईडी’ने दुबईतील सुमारे २०३.२७ कोटी रुपयांच्या अत्यंत आलिशान रिअल इस्टेट मालमत्तांवर थेट टाच आणली आहे.

या संपूर्ण कारवाईची पार्श्वभूमी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांशी जोडलेली आहे. मुंबई पोलिसांनी इक्बाल मिर्चीविरुद्ध भा.दं.वि. (IPC), आर्म्स ॲक्ट, टाडा (TADA) आणि एनडीपीएस (NDPS) सारख्या कडक कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल केले होते. या ‘एफआयआर’चा मुख्य आधार घेत ‘ईडी’ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार सखोल तपास सुरू केला होता. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, इक्बाल मिर्ची हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र विक्री यांसारख्या धोकादायक संघटित गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय होता. या गुन्हेगारीतून कमावलेल्या प्रचंड काळ्या पैशाचा वापर करून त्याने भारत आणि परदेशात आपल्या कुटुंबीयांच्या तसेच निकटवर्तीयांच्या नावावर कोट्यवधींच्या बेनामी मालमत्ता खरेदी केल्या होत्या.

तपासादरम्यान आणखी एक थक्क करणारी बाब समोर आली आहे. वरळी येथील या कोट्यवधींच्या मालमत्ता १९८६ मध्ये सर मोहम्मद युसूफ ट्रस्टकडून ‘रॉकसाईड एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून अवघ्या ६.५० लाख रुपयांना हस्तगत करण्यात आल्या होत्या. कागदोपत्री हा व्यवहार अत्यंत चलाखीने ट्रस्टच्या नावावर दाखवण्यात आला असला, तरी या मालमत्तेचा वास्तविक ताबा, उपभोग आणि मालकी ही पूर्णपणे इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाकडेच एकवटलेली होती. या ट्रस्टने मिर्चीच्या कुटुंबासोबत संगनमत करून न्यायालयासमोर बनावट कागदपत्रे आणि खोटे तथ्य सादर केले होते, तसेच पूर्वीच्या जप्ती प्रक्रियेतून ही मालमत्ता बेकायदेशीरपणे सोडवून घेतली होती, असा गंभीर आरोप ‘ईडी’ने आपल्या तपासात केला आहे.

गुन्हेगारीच्या पैशातून परदेशात उभारलेल्या साम्राज्याचा शोध घेताना ‘ईडी’ने दुबईतील मालमत्तांचा पर्दाफाश केला. इक्बाल मिर्चीचा मुलगा आसिफ इक्बाल मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर दुबईत ‘हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट’ तसेच नामांकित कॉर्पोरेट वे आणि डीईसी टॉवर्समध्ये १४ अत्यंत महागडी रिअल इस्टेट युनिट्स खरेदी करण्यात आली होती. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या थेट कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी पैशातून उभ्या राहिलेल्या साम्राज्याला मोठा तडा गेला असून, आर्थिक गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...