अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोना संकटात बंद झालेल्या शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
हिंगोलीहून मुंबईकडे जात असलेल्या मंत्री गायकवाड या काही काळ नगरला थांबल्या होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी त्यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.
त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा विचार हा दिवाळीनंतरच केला जाईल असे त्या म्हणाल्या. करोना संकटात शाळा सुरू नसल्या तरी राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू आहे.
या काळात पाल, शिक्षक व संस्थाचालकांनी एकमेकांशी चर्चा करून परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.
देशमुख यांनी जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती व शिक्षक, पालक, संस्थाचालकांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काटमोरे, माध्यमिकचे रामदास हराळ, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार उपस्थित होते.
काटमोरे यांनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या ‘स्वाध्याय पुस्तिका’ मंत्री गायकवाड यांच्याकडे सुर्पूत केल्या. मंत्री गायकवाड यांनी नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतूक केले.