जळगाव – सत्ता नसल्याने फडणवीस पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे तडफडत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगाव येथे एका रक्तदान शिबीरात ते बोलत होते.
खडसे म्हणाले, फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटते त्यांना रात्री बेरात्री पण स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. फडणवीस ब्राम्हण असल्याने त्यांचं भाकीत खरं ठरेल असं मला वाटत होतं. मात्र त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही.
दरम्यान, मी देखील राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. पण संकटाच्या काळात कधीही कुत्र्या-मांजरी सारखे खेळ खेळलो नाही असेही खडसे म्हणाले. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशावेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केल्याचेही खडसेंनी म्हटले आहे.