मुंबई | Mumbai
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, यावरुन प्रचंड सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात सरकारकडून शपथ घेणा-यांची नावे पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव आहे.
मुख्यमंत्री पद भुषविल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शिंदेंना पटले नसावे, परंतू आता ते उपमुख्यंत्री होण्यास राजी झाले आहेत, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यावरूनही शिंदे नाराज झाल्याचे वृत्त होते. तसेच शिंदेंनी गृहमंत्री पद व अर्थमंत्री पद मागितल्याचेही सांगितले जात होते. परंतू, याला भाजपाने होकार दिलेला नव्हता.
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकारबाहेर राहून काम करण्याच्या मताचे होते. मात्र, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेच पाहिजे. ते शिवसेना आमदारांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील झाले पाहिजे, असा रेटा शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला होता. तसेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले नाही तर आम्हीदेखील मंत्रीपदे स्वीकारणार नाही, अशा पवित्र्यात शिवसेना आमदार होते. अखेर या हट्टापुढे एकनाथ शिंदे यांना नमते घ्यावे लागले असून त्यांनी आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपध घेण्यास होकार दर्शविला आहे.
त्यानंतर शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काहीवेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले होते. या शिष्टमंडळात भरत गोगावले , उदय सामंत, रवी फाटक व संजय शिरसाट यांचा समावेश होता. या शिष्टमंडळासोबत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पत्र आहे. हे पत्र आता राजभवनात नेऊन दिले जाईल. माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र देण्यासाठी मी राज्यपालांकडे जात आहे.
उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना सुरु केल्या होत्या. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. ते पक्ष प्रमुख म्हणून काम करणार होते. परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास तयार झाले. दरम्यान, गृहमंत्रीपदाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. गृहमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आता त्यांना भाजप हे पद देणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.