सोलापूर | Solapur
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि एकमेकांच्या पक्ष फोडीवरून वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र आहे. या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसून आलेल्या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केले आहे.
सोलापूरमधील अक्कलकोट येथे निवडणूक प्रचारासाठी एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत राहून नरेंद्र मोदींचे हात आम्ही अधिक बळकट केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो आणि प्रचंड यश मिळवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागलं
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागलं आहे. अजूनही काहींना एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पचत नाही. त्यामुळे त्यांची मळमळ अजूनही सुरूच आहे. ते पुढे म्हणाले “माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. मी कुठून आलो? एक साधा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, ही गोष्ट काहींना अजूनही समजत नाही. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, भूक लागत नाही आणि दिवस सुरु होत नाही. अशी खरमरीत टीका त्यांनी केली. महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे. काही माध्यमांमधून सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जनता भ्रमित होणार नाही. कारण जनता आणि आमचे कार्यकर्ते वास्तव जाणतात. असे म्हणत शिंदे यांनी सामनामध्ये छापून आलेल्या अग्रलेखाचा देखील समाचार घेताला.
दोन खुर्च्या होत्या म्हणून राजकीय अर्थ काढणे चुकीचे
कालच्या कार्यक्रमाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, कार्यक्रमात दोन खुर्च्या होत्या म्हणून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला मंत्री बसले होते. त्यात राजकीय संकेत शोधण्याची गरज नाही.
खरा शत्रू फक्त महाविकास आघाडी
लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत राहून नरेंद्र मोदींचे हात आम्ही अधिक बळकट केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो आणि प्रचंड यश मिळवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत, आमचा खरा शत्रू फक्त महाविकास आघाडी आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





