अकोले(प्रतिनिधी)-
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस सुरू राहील हे सांगता येत नाही. महिना होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. राज्यात अतिवृष्टी सुरू आहे, अशा अडचणीच्या काळात वास्तविक मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात जाऊन ठाण मांडायला पाहिजे होते अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकोले दौऱ्या वेळी पत्रकारांशी बोलतांना केली.
अगस्ति कारखान्यातील शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारार्थ अजित पवार यांची अकोले जवळील विठ्ठल लॉन्स येथे जाहीर सभा पार पडली. सभेनंतर पत्रकारांशी अजित पवार बोलत होते.
सभेत बोलताना पवार यांनी कारखाना स्थापनेपासून आजपर्यंतचा दिड दोन वर्षांचा अपवाद वगळता माजी मंत्री मधुकरराव पिचड हे चेअरमन राहिले,त्यामुळे कारखाना तोट्यात आला म्हणजे त्यास व्हा.चेअरमन सिताराम पाटील गायकर हे एकमेव दोषी होऊ शकत नाही असे सांगत पिचड यांनी एव्हढे वर्ष चेअरमन असतांना कारखाना कर्जमुक्त का झाला नाही याचे उत्तर द्यायला पाहिजे. वास्तविक वयोमानानुसार पिचड यांनी कारखान्यातुन आता बाजूला झाले पाहिजे मात्र मीच पाहिजे असे कसे चालेल असा सवाल त्यांना केला आहे.
अकोले तालुका एज्युकेशन संस्था सुरू करण्यात ज्यांचे योगदान राहिले त्यांना बाजूला करून घरातील लोकांच्या मालकीची संस्था करणार का? असा सवालही पिचड यांना केला.
केंद्र व राज्यात माझे सरकार आहे असे पिचड म्हणतात यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून चिठ्ठी आली असता त्यावर बोलतांना पवार यांनी सरकार काय यांच्या घरचे आहे का? सरकार येत जात राहणार, कोणी ताम्रपट घेऊन आले नाही अशी टीकाही त्यांनी केली.
2019 च्या विधानसभा निवडणूकीत ज्या पद्धतीने माझी विनंती तुम्ही ऐकली त्यापद्धतीने अगस्ति कारखाना निवडणुकीत सुद्धा ऐकावे असे साकडे पवार यांनी उपस्थित शेतकरी, सभासदांना घातली. जर माझ्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ चुकीचे वागले तर मी जबाबदारी घेतो असे सांगत समृद्धी मंडळाचे नूतन संचालक मंडळ आपल्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही मी देतो अशा शब्दात त्यांनी शेतकरी समृद्धी मंडळाचे समर्थन केले.