मुंबई | Mumbai
राज्यातील बळीराजासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर आता राज्य सरकारने कर्जमाफी योजनेला कॅबिनेट बैठकीत मान्यता दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना जून महिन्यात गुडन्यूज मिळेल, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जून महिन्यात घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानुसार, आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाणार आहे. दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेस मान्यता देण्यात आली.
मंजूरी मिळाली पण घोषणा बाकी
सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या कडक नियमांनुसार, आचारसंहितेच्या काळात सरकारला कोणत्याही मोठ्या धोरणात्मक निर्णयाची किंवा थेट जनतेला प्रभावित करणाऱ्या योजनेची जाहीर घोषणा करता येत नाही. याच नियमाचा अडथळा आल्यामुळे मंत्रिमंडळाने कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर केला असला, तरी त्याची अधिकृत घोषणा तूर्तास रोखून धरण्यात आली आहे.
५६ लाख शेतकर्यांची कर्जमाफी
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ५६ लाख शेतकर्यांची कर्जमाफी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफीची अंदाजे रक्कम जवळपास ३६,००० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची चर्चा झाली. २० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा कसे होतील, यावर चर्चा झाली.
३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ममाफाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आज यावर शिक्कामोर्तब झालं.
या कर्जमाफीअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. याशिवाय, जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचा विशेष लाभ दिला जाणार आहे. राज्यात एकूण १ कोटी ३३ लाख शेतकरी असून त्यापैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याचे बँकर्स समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.




