गाझियाबाद :
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरु असलेली शेतकरी आंदोलने मोडीत काढण्यासाठी सुरुवात केली आहे. गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. कलम १४४ लावण्यात आले आहे.
गाझीपूरमध्ये वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. गुरुवारी मथुरामध्ये डीएम आणि एसएसपी यांनी चर्चा करून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले आहे. तर आता उत्तर प्रदेशातील गाझीपूर सीमेवरील सर्वात मोठे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी मोठी तयारी सुरू करण्यात आली आहे. गाझीपूर बॉर्डरवर सध्या मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचे चमूही आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत. याशिवाय स्थानिक लोकही येथे जमले असून त्यांनी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदा परत घेतले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली.