नाशिक । प्रतिनिधी Nashik
देशाच्या वायव्य भागात नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठीची अनुकूल स्थिती तयार झाली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत केव्हाही या भागातून मोसमी पाऊस परतण्यास सुरूवात होईल. त्यामुळे कोकण वगळता महाराष्ट्रात दि.22 सप्टेंबरपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
देशाच्या वायव्य भागात पश्चिम राजस्थान (श्रीगंगानगर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, झालोर) पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात आज बदललेल्या वातावरणामुळे जमिनीलगत तयार झालेला उच्च दाब व त्यातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहणार्या वार्याच्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी अनुकूल स्थिती तेथे तयार झाली आहे.
त्यामुळे येत्या 21 सप्टेंबरपर्यंत केव्हाही या भागातून पाऊस परतण्यास सुरूवात होईल, असे आहे, असा अंदाज निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. असे असले तरी महाराष्ट्रात 21 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काहिसा कमी राहण्याची शक्यता कायम आहे. कोकण वगळता महाराष्ट्रात 22 सप्टेंबरपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.
मुसळधारेचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. पावसाचा मुक्काम अजून हलण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा वेळी हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर प्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाला आहे.