नवी दिल्ली | New Delhi
कर्जवसुलीसाठी बँकांकडून (Bank Loan Recovery)सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Central Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मोठी घोषणा केली आहे. खासगी किंवा सरकारी बँकांनी कर्जवसुली करताना कठोर पावले उचलू नयेत, असे सीतारामन म्हणाल्या. कर्जाच्या वसुलीसाठी अनेकदा बँकांकडून वारंवार फोन करुन धमकावले जाते किंवा घरी येऊन लोकांसमोर अपमानित केले जाते. त्यांनी अशा बँकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
कर्जवसुलीसाठी बँका सर्वसामान्यांना त्रास देत असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) एका खासदाराने कर्जवसुलीसाठी (Loan) बँकांकडून सर्वसामान्यांना धमकावणे किंवा वेगवेगळे हातखंडे वापरले जात असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले की, सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे. सर्व बँकांना ‘मर्यादेत’ राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! EPFO ने व्याजदरासंदर्भात घेतला महत्वाचा निर्णय
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘कर्ज वसुलीसाठी काही बँका लोकांशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. सरकारने अशा बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे आरबीआयला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सरकारी बँका असोत किंवा खाजगी बँका, त्यांनी कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलू नयेत. कर्ज वसुलीसाठी जेव्हा सामान्यांशी संपर्क साधला जातो, तेव्हा माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे.’
कर्ज वसुलीबाबत RBI मार्गदर्शक तत्त्वे
बँकेचा कर्ज वसुली एजंट ग्राहकाला सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच कॉल करू शकतो.
एजंट ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणीच भेटू शकतो.
ग्राहकाने विचारल्यास एजंटला बँकेने दिलेले ओळखपत्र दाखवावे लागेल.
बँकेला ग्राहकांची गोपनीयता सर्वोच्च ठेवावी लागेल.
बँकेला ग्राहकाचा शारीरिक किंवा मानसिक छळ करता येत नाही.
एखाद्या ग्राहकासोबत असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो.