नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओडिशातील आरोग्य सेवेचा कणा समजल्या जाणाऱ्या कटक येथील ‘श्री रामचंद्र भंज’ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आज (16 मार्च) पहाटे भीषण अग्नितांडव घडले. ट्रॉमा केअर आयसीयूला लागलेल्या भीषण आगीत १० गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीत ११ कर्मचारी सुद्धा होरपळले आहे. या घटनेने संपूर्ण ओडिशासह देश हळहळला असून, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास जेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक आयसीयू विभागातून धूर निघाल्याचे समजले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आयसीयूमध्ये गंभीर रुग्ण असल्याने आणि व्हेंटिलेटरसारखी उपकरणे कार्यान्वित असल्याने गोंधळ अधिक वाढला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे रुग्णांना बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यावेळी तिथे एकुण २३ रुग्ण दाखल होते. धुर आणि आगीमुळे श्वास गुदमरल्यामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाला तर अन्य रुग्णांना इतर विभागात हलवण्यात आले मात्र उपचारावेळी अन्य तिघांचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांच्या धाडसाने अनेकांचा जीव वाचला
हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. या रुग्णांना तातडीने त्याच आवारातील ‘न्यू मेडिसिन बिल्डिंग’ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. रुग्णांना सुरक्षित बाहेर काढताना अनेक कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी रुग्णांची विचारपूस केली. मुख्यमंत्री माझी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. राज्यपाल हरि बाबू कम्भमपति यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.





