नवी दिल्ली – देशातील 80 कोटी गरीबांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही मे-जूनपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना वाढविण्यात आली होती. मात्र आता ही योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार गरीबांसोबत उभे आहे. या योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार गरीबांना उपाशी पोटी झोपू देणार नाही.
दरम्यान, करोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडकडीत निर्बंध लादले आहेत. या काळात गरीब जनतेला अथवा हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गरीब जनतेसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.