मनमाड | प्रतिनिधी Manmad
शहर परिसरासह ग्रामीण भागात आज सलग दुसर्या दिवशी पावसाचे जोरदार आगमन झाले. मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढल्याने सर्वच रस्ते जलमय होवून सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, दमदार पावसामुळे करपू लागलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला मात्र नदी, नाले ओसंडून वाहतील असा मोठा पाऊस झालेला नसल्याने विहिरींना अद्याप पाणी उतरलेले नाही.
यंदा मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता त्यानंतर जून महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढे ही चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकर्यांनी खरीपाची पेरणी केली पिके देखील चांगली बहरली असताना पावसाने पाठ फिरवली होती तब्बल २० दिवसापेक्षा जास्त पावसाने उसंत घेतल्यामुळे याचा परिणाम पिकावर होऊन पिके करपू लागली होती.पिकांनी मान टाकल्याचे पाहून दुबार पेरणी तर करावी लागणार नाही ना?अशी चिंता शेतकर्यांना भेडसावत होती तर तीव्र तापमानाने नागरिक हैराण झाले होते.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शुक्रवारी दमदार पावसाचे आगमन झाले. रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. शनिवारी सकाळी पावसाने उघडीप घेतली मात्र दुपार नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होऊन एक तासांपेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस दमदार पाऊस झाल्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला तसेच करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे




