Saturday, August 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या - जयंत पाटील यांचे उच्च न्यायालयाला...

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च न्यायालयाला पत्र

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी आणि गोंधळ झाल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना पत्र लिहून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

टायपिंग टेस्टदरम्यान अनेक परीक्षा केंद्रांवर की-बोर्ड व्यवस्थित काम न करणे, सॉफ्टवेअर आणि इंटरफेसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होणे, परीक्षेदरम्यान स्क्रीन फ्रीज होणे तसेच टायपिंग करताना अक्षरे उशिराने उमटणे अथवा न उमटणे अशा स्वरूपाच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांचा वेळ वाया गेला असून, त्यांच्या कामगिरीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, या तक्रारी केवळ सांगली किंवा कोल्हापूर जिल्ह्यापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरून अशाच स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

केवळ तांत्रिक कारणांमुळे एखाद्या उमेदवारावर अन्याय होणे योग्य नाही. अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने या परीक्षेची तयारी केली आहे. परीक्षा केंद्रावरील तांत्रिक त्रुटींची किंमत उमेदवारांना मोजावी लागू नये. परीक्षेला उपस्थित राहिलेल्या उमेदवारांच्या तक्रारी रास्त असल्यास त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अथवा सर्व संबंधित उमेदवारांसाठी स्वतंत्र फेरपरीक्षा आयोजित करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक,रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र आणि जर्मनीतील हेसन राज्य यांच्यामधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसन...