घोटी | जाकीर शेख Ghoti
इगतपुरी तालुक्यात शनिवार दि. २६ रोजी सहा वाजेपासून मुसळधार पाऊस पडला असुन एकाच दिवसात १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सर्वदूर पाऊस पडत असून हा पाऊस भात शेतीसाठी आता नुकसान दायक ठरण्याचे चिन्ह आहे. गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यात पावसाने सरसरी पेक्षा जास्त वाटचाल केली आहे. साधारण दरवर्षी चार हजार मिमि पाऊस पडतो. मात्र यावर्षी पावसाने इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत ४३७२ मिमीची नोंद केली आहे. त्यामुळे भात शेतीसाठी हा पाऊस नुकसान दायक ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या वर्षी ऐन गणेश उत्सवात या मुसळधार पावसाने थैमान घातले होते. गपणती उत्सवात सतत दहा दिवस पाऊस पडला होता. या मुसळधार पावसामुळे घाटनदेवी येथे सुरु असलेल्या नवरात्रौ ऊत्सवावर परिणाम झाला असून पावसामुळे भाविकांची गर्दी कमी झाली आहे. तसेच रात्री होणाऱ्या दांडीया देखिल बंद असल्याने दांडीयाप्रेमी तरुण तरुणींचा हिरमोड झाला आहे. रविवारी इगतपुरी शहरातील आठवडे बाजारावर ही परिणाम झाला असून आठवडे बाजारात दुकाने लागली नाहीत. तर तालुक्यातील सर्व धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.
इगतपुरी तालुक्यात कालपासुन इगतपुरी शहरासह घोटी व भावली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. कालपासुन आजही हा पाऊस कायम आहे. या पावसामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कसारा घाटातही मुसळधार पावसासह धुक्याचे साम्राज्य पसरले होते. पावसाची पाश्चिम भागात जोरदार बॅंटीग : तालुक्याच्या पाश्चिम भागात पावसाने समाधानकारक वृष्टी केल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्याबरोबरच भात लागवडीच्या कामांना वेग आला असुन पहाटेपासुनच लगबग होतांना दिसुन येत आहे.
या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाले असुन भावली, वाकी, वैतरणा व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.





