मोहनदास भामरे
धुळे – Dhule
हॅलो, अहो दाजी, पंत, पाहुणे…,
अधिकमासाचे वाण घ्यायला या बरं का…या हं…
असा सालीबाईंचा फोन सासरवाडीहुन आला. आता सासुरवाडीचाच फोन.. तो ही वाण मिळण्याचा,दान मिळण्याचा..आणि त्यातही सालीबाईंचा लाडीक लाडीक आग्रह..
मग काय पाहणं?
आनंदी आनंद गडे..
ईकडे तिकडे चोहीकडे
अशा या आनंदात अस्मादिक हरखुन न गेले तरच नवल?
काय काय दान करणार गं सासुबाई?
माझा आतताई प्रश्न..
सालीबाई गोड हसली.
तुम्ही या तर खरं.. सालीबाई उत्तरल्या.
अहौ, हे काय? असं विचारतात का कधी? जी रीतभात असेल ती मिळेल..कधी समजेल बाई या माणसाला?
बायकोने डोळे ताणुन माझ्या आनंदावर विरजन घातले. पण बायकोचीच बहीण ती.. तिकडुन तिने सांगायला सुरुवात केली.
अहो,…दाजी, पंत, पाहुणे सर्व देउच की.33 अनारसे 33 रेवडी, तांबेपात्र आणि वरुन परात भरुन गरमागरम जिलेबी…..
ट्रे भरुन गोडशेव, नारळांचे पोते,
कापड दुकान…. भांड्यांचे दुकान…
अरे बापरे, एवढं? नको ग बाई.. सासर्याचं दिवाळं निघेल ना., आमचा मध्यमवर्गीयपणा लगेच काळजीच्या सुरात म्हणाला.
तसं साली खोऽऽ खोऽऽ हसली.
अहो तसं नाही काही,
सध्या कोरोनाने सर्वांना खंगाळुन टाकलय… खंगरुन टाकलय,,
वाणात एवढं मिळणार नाही हो,, जिलेबीच्या ताटातल्या चाकोळीचा घमघमाट,..
ट्रे भर गोडशेव चा कुरकुरीतपणा….. नारळाच्या पोत्याचं देखणेपण, कापड दुकानातल्या कापडाचे मखमलीरुप.., शंकरपाळ्याचा गोडवा, भजीचा खमंग वास, लाडुच्या गोडव्याचे दर्शन.. ईतकं मिळेल.
गरीब आहेत माझे आई वडील.. पण जावायाला देतांना काहीच कमी करत नाही म्हटलं.. या बरं का दाजी, वाण घ्यायला या…
सालीने साग्रसंगीत आग्रह केला.
अगगगग, बापरे.. नको ग बाई एवढं वाण…दिवाळं निघेल ना..
मी आपली कीव दाखवली. नाही हो.. थोडं थोडंच देऊ. हा वाण म्हणजे प्रसादासारखा,.
थोडासाच घ्यावा., मान पानाने घ्यावा,, सासर्याचं बजेट बिघडवणारा नसावा.मिळाला तर आनंद आणि नाही मिळाला तरी आनंद…
मग काय येताहेत ना?
असा आग्रह व कोपरखळीच्या सुमधुर तंब्या देत ती म्हणाली. सध्या अधिक मास सुरु असल्याने तमाम सासु सासर्यांची जावाईबापुंना वाण लावण्यासाठी लगभग सुरु आहे.
जगात प्रत्येक माणुस जावाई असतो.. म्हणून सर्वांना वाण मिळत असतो.सासरेबुवांपेक्षा सासुबाईंची जास्त तगमग व तळमळ सुरु असते. भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन त्यातुन दिसते. तांब्याचे ताट दिवा अनारसे रेवडी तीळाचे दान नवे कपडे ,पुरणाचे धोंडे करुन गाईला खाउ घालणे.. जावायाला दान देणे.
एकंदरीत दर तीन वर्षांनी जावाई बापुंची चंगळ असते. सासरेबुवांकडुन हा त्रैवार्षिक बोनस असतो असं घडीभर म्हणू या. पण आता यावर्षी नकाहो बोलवू आम्हा जावायांना…
उगाच प्रवास नको.कुठे कुणाकडे जाणे येणे नको.. खर्च नको..
आपण मनाने हा वाण द्या.मानाने द्या.. जेथे आहेत तेथुन द्या.. तेथुन घ्या.. वातावरण खराब आहे. असं रमत गमत बोलाचा भात नि बोलाचीच कढी सुध्दा आनंद देते.गंमत जंमत येते.
जो देगा उसका भला, ना देगा उसका भी भला अशा अमीर फकीरीतही आनंद आहे.
जे मिळालं ते घ्या.. तेच गोड करा..हे वा असे 33 सद् गुण, 33 संस्कार, 33 तुळशीपत्र, 33 प्रेम, 33 आदर, 33 सत्कार द्या.. त्यातच 33 कोटी देव भेटतील.
मुंगीला साखर द्या
चिमणीला पाणी द्या
गाईंना गवत घालुन
सर्वांना गोड वाणी द्या
भुकेल्याला घास द्या
तहानलेल्याला घोट द्या
बेसहार्याला सहारा देउन
हरवलेल्याला बोट द्या
संकटाच्या समयी
गरीबाला हात द्या
आंसवे त्यांचे पुसुन
खचलेल्यांना साथ द्या
हेच मागणे आता
सारे पावेल असे द्या
ईवल्याशा ओंजळीत
मावेल ईतकेच द्या
नको काही देणे घेणे
प्रेमळ शब्दांचे वाण द्या
काहीच न घेतल्याचा
आत्मानंद भरुन द्या!
भारतीय संस्कृतीचे अनादि अनंत काळापासुन सुरु असलेले सण, ऊत्सव, रुढी, परंपरा आपण जपायचे आहेत, तो वारसा पुढे न्यायचा आहे. पुढे द्यायचा आहे
पण काळानुरुप, काळासदृश त्यात बदल ही केला पाहिजे..
कारण बदल हाच प्रगतीला पुरक असतो..
हे माझं सर्व ऐकुन
तिकडे साली लाजली
ईकडे बायको वाजली.
मी मात्र अधिक मासात ऊणे झालो.
– मो.नं.98505 15422