नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सध्या अमेरिका-भारत संबंध टॅरिफ मुद्द्यावरून प्रचंड ताणले गेले आहेत. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय वस्तूंवरील टॅरिफ आणखी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असतानाच आता अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी दावा केला केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही फोन न असल्याने व्यापार करार होऊ शकले नाहीत. यासाठी अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे.
हॉवर्ड लुटनिक यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत भारत-अमेरिका व्यापार करारावर भाष्य केले आहे. लुटनिक म्हणाले, मी व्यापार कराराची सर्व तयारी केली होती. पण पंतप्रधान मोदींनी एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करावा, असे सुचवले. मात्र, भारत यासाठी असहज होता आणि मोदींनी फोन केला नाही. म्हणून, दोन्ही देशांमधील सहा फेऱ्यांच्या चर्चेनंतरही हा करार पूर्ण होऊ शकला नाही.
दरम्यान अमेरिकेने इंडोनेशिया, फिलीपीन्स आणि व्हिएतनामसारख्या देशांशी व्यापार करार पूर्ण केले. या देशांच्या आधी भारताबरोबरचा व्यापार करार होऊन जाईल, असे आम्ही गृहित धरले होते. पण अडचण अशी झाली की, भारताने जादा दर लावला होता नंतर घुमजाव करत म्हटले की, आम्ही करारासाठी तयार आहोत. तेव्हा मी आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, तुम्ही कशासाठी तयार आहात?”, अशा शब्दात भारत-अमेरिका करार रद्द होण्याचा घटनाक्रम लुटनिक यांनी सांगितला.




