तिरुअनंतपुरम | Thiruvananthapuram
टी-20 वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 4-1 असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुअनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा उडवला आहे.
वर्ल्डकपपूर्वी ईशान किशनने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. अवघ्या 42 चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केले. पुढे तो 43 चेंडूमध्ये 103 धावांची तुफानी खेळी करून बाद झाला. या खेळीत ईशानने 6 चौकार आणि तब्बल 10 षटकार लगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांची मोलाची साथ लाभली. सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावत 30 चेंडूमध्ये 63 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. या तिघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने अवघ्या 5 विकेट्स गमावत 271 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 225 धावांतच आटोपला.
न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी सलामीवीर टिम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या 5 धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने 6 षटकार आणि 8 चौकारांसह 30 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघात कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ 225 धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने 46 धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.




