नवी दिल्ली | New Delhi –
लडाखच्या पूर्व सीमेवरील वेगवेगळ्या भागांमधून विश्वासघातकी चीनच्या सैनिकांनी गेल्या तीन दिवसांत तीनवेळा
घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले आहेत.
29 ऑगस्टच्या रात्री चीनच्या 500 सैनिकांनी घुसखोरी केली होती, पण भारतीय जवानांनी त्यांना मागे फिरण्यास भाग पाडले होते. यानंतर तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चाचली. दुसर्या दिवशीही (30 ऑगस्ट) बैठक सुरू असताना चिन्यांनी आगळीक केली होती.
31 ऑगस्टच्या रात्री चीनचे सैनिक 7 ते 8 मोठ्या वाहनांमधून भारतीय सीमेकडे येत होती. पेंगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्यावर भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न होता. मात्र, चेपुजी छावणीजवळ तैनात असलेल्या जवानांनी त्यांना रोखले. काला टॉप भागात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चिनी सैनिक येत असताना भारतीय जवानांनी मेगाफोनवर इशारा दिला. त्यानंतर चिनी मागे फिरले. त्यानंतर 1 सप्टेंबरला सकाळी चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा डावही जवानांनी उधळून लावला.
राजनाथसिंहांनी घेतला आढावा
सलग तीन दिवस झालेल्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून लडाख सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.