मुंबई | Mumbai
आज (रविवारी) आयपीएलमध्ये दोन सामने खेळविले जाणार असून, पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. तसेच दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (LSG vs PBKS) यांच्यात होईल. कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे तर रियान परागकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद असणार आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यर आणि लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद रिषभ पंतकडे आहे.
यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने चमकदार कामगिरी केली असून, त्यांनी ५ सामने खेळले आहेत. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघाला पराभूत केले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात निराशाजनक आहे. संघाच्या कामगिवर नजर टाकल्यास सातत्याचा अभाव दिसून आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी उर्वरित ९ पैकी ७ ते ८ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे.
आयपीएल स्पर्धेमध्ये ३२ सामने खेळले गेले असून, राजस्थान रॉयल्सने १४ तर कोलकाता नाईट रायडर्सने १६ सामने जिंकले आहेत. २ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. तसेच ईडन गार्डन्स मैदानावर १० सामने खेळले असून, कोलकाता नाईट रायडर्स ६-४ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये साखळी फेरीत दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळले गेले होते. दोन्ही सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केले होते.
तसेच २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला राजस्थान रॉयल्सने पराभूत केले होते.या पराभवाची परतफेड करण्याची संधी कोलकाता नाईट रायडर्सकडे असणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली होती. विजयी मार्गावर परतण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स सज्ज असणार आहे.
लखनौ-पंजाब सायंकाळी भिडणार
दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरूध्द विजय संपादन केला आहे. तर गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द सलग ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघांसाठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य असणार आहे. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय संपादन केला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज असणार आहे. विशेष म्हणजे मुल्लानपुर मैदानावर दोन्ही संघांमध्ये प्रथमच सामना खेळविण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये ६ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी ३-३ विजय संपादन केले आहेत.





