अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी जेऊर बायजाबाई (नगर) गावातील एका गोठ्यावर छापा टाकून गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्या टोळीचा पर्दाफाश केला असून या कारवाईत 4 लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 500 किलो गोमांस, पाच जिवंत गोवंशीय जनावरे, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि वाहने यांचा समावेश आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
रविवारी (8 जून) सकाळी सहायक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी जेऊर बायजाबाई गावातील मुनाफ चाँद शेख व मुजफ्फर चाँद शेख यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यावर छापा टाकला. छाप्यावेळी सलमान अजीज शेख (वय 25, रा. घासगल्ली, कोठला) हा व्यक्ती घटनास्थळी आढळून आला व त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली. त्या नावांमध्ये इकलास शेख, मुनाफ चाँद शेख, मुजफ्फर चाँद शेख व अस्लम खलील कुरेशी यांचा समावेश आहे.
पोलिसांनी नमूद ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, निर्दयतेने डांबून ठेवलेली 5 गोवंशीय जनावरे, कत्तल केलेले 500 किलो गोमांस, तसेच वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार भगवान वंजारी, सुरेश सानप, ज्ञानेश्वर तांदळे, पवार आदींच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.