मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून कोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतील (Mumbai) कबूतर खाने (Kabutar Khana) बंद करण्यात आले आहेत. यामुळे जैन धर्मीय तीव्र नाराज झाले असून, त्यांनी सरकारविरोधात नाराजीचा तीव्र सूर आवळला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) दादरच्या (Dadar) योगी सभागृहात ‘बूतर बचाओ धर्मसभा’ आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू,बौद्ध धर्मगुरु एकाच मंचावर आले. मात्र या धर्मसभेत जैन धर्मगुरुंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जैनमूनी कैवल्य रत्न महाराज (Kaivalya Ratna Maharaj) म्हणाले की, “कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे. मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्याने काय होतं?, दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही”,असं त्यांनी म्हटले.
आम्ही हाती शस्त्र घ्यायलाही तयार
आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाला तर, आम्ही त्याचं उत्तर देतो. मग त्यामध्ये शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत आहेत त्यांना साधुसंतांनी बसवलं आहे. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्ही साधुसंत रस्त्यावर उतरू नागा साधू मोठ्या प्रमाणावरती आम्ही एकत्र जमवू आणि आंदोलन करु”, असा इशारा स्वरूपानंदजी महाराज यांनी दिला.
सरकारची मिलीभगत
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat) आले नाही ही सरकारची मिलीभगत आहे. मी जाहीरपणे सांगतो हे फक्त तुमचं राजकारण आहे. बाकी काही नाही! कबुतराला तुम्ही फक्त एक निमित्त केलं आहे, ते हत्यार केलं आहे. कबुतराशी येथे काही घेणंदेणं नाही. त्यांच्या विष्ठेपासून पसरणाऱ्या रोगांचेही याठिकाणी देणं घेणं नाही. एखाद्याचाच काय तर, हजारो, लाखोंचा मृत्यू ओढावला त्यांच्यासाठी कोणी विचार करत नाही. कबूतर शांती प्रिय प्राणी आहे. जर पशुपक्ष्यांचे निसर्ग चक्र चालले नाही तर नाश होईल, असे धर्मगुरू कैवल्य रत्न महाराज म्हणाले.
राजकीय पक्षाच्या स्थापनेची केली घोषणा
जैनमुनी निलेशचंद्र गुरुदेव म्हणाले की, “शांती दुतांचे प्राण वाचवा,कबूतर खाने खोला. मी कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आलो नाही, तर शांती दुतांसाठी आलो आहे. काही बोलत होते कबूतर, कबूतर करत आहेत. ज्यांनी कबूतरच्या चक्करमुळे कोण कोणती पार्टी जाते माहीत नाही. जितके लोक कबुतरामुळे मृत्यूमुखी पडले नाहीत, तेवढे दारू आणि नशेमुळे गेले. मी ’शांती दूत जनकल्याण पार्टीची’ घोषणा करतो. ज्यांचे जनकल्याण आहे ते मुंबई महापालिकेत जातील.आता कबुतरचं निर्णय घेतील की कोण राज सत्तेवर बसेल. आम्ही शांती प्रिय समाज आहोत. मराठी बोला म्हणतात पण एकच मर्द पैदा झाला होता तो बाळासाहेब ठाकरे. तो जोपर्यंत होता, तोपर्यंत एकाचाही आवाज नव्हता” असंही त्यांनी सांगितले.





