कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगावातील येवला नाका परिसरात गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. राहाता येथून नगरसुलच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्यावर कंटेनरचे मागील चाक चढल्याने 55 वर्षीय संगीता रामकृष्ण महाले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात दुपारी 12 च्या सुमारास घडला. जुपिटर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या दाम्पत्यावर हायवेजवळ उभ्या असलेल्या उसाच्या आडतीमुळे हा अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. रस्त्याच्या कडेला उसाने भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर अनधिकृतपणे उभे राहत असल्याने येथे अपघातांचा धोका कायम आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती, मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत वाहतूक सुरळीत केली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
पोलिसांनी या प्रकरणी उसाने भरलेला एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून, तपास सुरू आहे. स्थानिकांनी उसाच्या आडतीमुळे होणाऱ्या अतिक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर धोरण राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी रस्ता सुरक्षेसाठी अधिक जागरूकता आणि प्रशासकीय कारवाईची गरज असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाई सुरू आहे.





