संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील श्रीरामनगर येथील बालाजी कार मोटार रिपेअरिंग व स्पेअर पार्टच्या दुकानात घुसून आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पैसे, सोनसाखळी आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 9) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना गजाआड केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरीष अनंत शहाणे (वय 38) यांचे श्रीरामनगर शेजारी बालाजी कार मोटार रिपेअरिंग व स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास दुकानामध्ये काम चालू होते. त्यावेळी दुकानाशेजारील मोकळ्या इमारतीमध्ये नेहमी दारू पिणारे धीरज पावडे, पिल्या घोडेकर, वरद लोहकरे, दीपक वैराळ, संदीप संजय वाल्हेकर उर्फ जब्या, निखील उर्फ अजय विजय वाल्हेकर व इतर दोन अनोळखी होते. त्यांनी सर्वांनी शिवीगाळ करत दुकानाचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांची गच्ची पकडून हाताने मारहाण केली व धीरज पावडे यांनी हातातील कोयत्याने धाक दाखविला व हाताने शहाणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना आम्हाला मारू नका असे म्हणून जवळच्या लोकांची मदत मागितली असता, धीरज पावडे यांनी कोयता हवेत फिरवून खबरदार, कोणी पुढे याल तर त्यालाही मी तोडून टाकीन. आम्हाला हप्ता चालू करायचा, नाहीतर दुकानाची तोडफोड करून जाळून टाकीन अशी धमकी दिली.
यानंतर दोघांनी व्यवस्थापक भुजबळ यांना हाताने मारहाण करून काऊंटरची चावी घेऊन काऊंटरमधील सर्व पैसे बळजबरीने काढून घेतले. तसेच पावडे यांनी मालक शहाणे यांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतली व दोघांना मारहाण करु लागले. त्यावेळी दुकान बंद करु लागले असता, सर्वजण तेथून पायी चालत निघून गेले. त्यानंतर जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भाग्यश्री दिलीप गायकवाड (रा. चैतन्यनगर, ता संगमनेर) यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यांनी दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी, 10 हजार रुपये रोख त्यात व 1 लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला आहे.
याप्रकरणी शिरीष शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील निष्पन्न सहा आणि अनोळखी दोघे अशा आठ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील धीरज पावडे, संदीप वाल्हेकर व दीपक वैराळ या तिघांना अटक केली असून उर्वरित पसार आहेत. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहे.





