अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
यापूर्वी या जलसागराचा उल्लेख ‘शिवाजी जलसागर’ असा केला जात होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने जलसागराचे अधिकृत नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या नामांतरासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
जलसंपदा विभागाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नामांतरास मंजुरी दिली. त्यानंतर राज्य शासनाने अधिकृत शासन आदेश जारी करून हा निर्णय अमलात आणला. या निर्णयामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यातील जनतेच्या मनात असलेला आदर आणि गौरव या निर्णयातून अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानताना सांगितले की, शिवप्रेमी नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखत आणि जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करणारा हा निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले.




